व्यासपुत्र शुकाला आत्मज्ञानाची प्राप्ती   

भावार्थ रामायणातील कथा, विलास सूर्यकांत अत्रे

रामाशी बोलता बोलता विश्वामित्र रामाला म्हणाले, ‘रघुनाथा तुझे वैराग्य  परम श्रेष्ठ आहे. वैराग्याशिवाय ज्ञान दुर्लभ आहे. व्यास पुत्र शुक जसा जन्मजात जीवनमुक्त होता तसाच तू आहेस; मात्र त्या शुकाच्या मनातही एकदा विकल्प आला होता आणि त्या विकल्पामुळे शुकाचा घात झाला होता. केवळ गुरूकृपेमुळे तो घात होऊनही शुकाला त्याची साधना पूर्ण करता आली, त्याला परमार्थ साधता आला.‘ रामाला शुकांबद्दल कुतुहल निर्माण झाले आणि त्याने शुकाची संपूर्ण कथा सांगण्याची विनंती विश्वामित्रांना केली.  
 
विश्वामित्र सांगू लागले ‘व्यासपुत्र शुक, त्याच्या ज्ञानाला सीमा नव्हती. जन्मजात तो जीवनमुक्त होता. त्याचे वैराग्य कडकडीत होते. त्याने लग्न केले नव्हते. त्याने संन्यासही ग्रहण केला नव्हता. हे काहीही न करता, आपले वडील व्यास त्यांनाही न सांगताच सर्वसंग परित्याग करून घरदार सोडून तो निघाला. पुत्रप्रेमामुळे व्यास त्याच्या मागे गेले. त्याच्या मागे जाताना त्यांनी शुकाला हाका मारण्यास सुरुवात केली. शुकाला आपला देह म्हणजे आत्मा नाही याचे ज्ञान होते. आत्मा वेगळा आहे तो देहातीत असतो. त्या हाका ऐकून शुकाने त्यांना उत्तर दिले होते की, ‘एका देहात सामावणारा मी शुक नाही. मी सर्वव्यापी आहे‘. त्यावर व्यासांनी पुन्हा शुकाला हाका मारण्यास सुरुवात केली. शुक सर्वव्यापी त्यामुळे व्यासांच्या हाकांना आसपासचे सगळे वृक्ष ओ देऊ लागले, व्यासांना प्रतिसाद देऊ लागले. आपल्या मुलाचे म्हणजे शुकाचे पूर्णपण व्यासांना समजून आले; मात्र तो पर्यंत शुकाने स्त्रियांचे दर्शन घेतलेले नव्हते; मात्र एकदा स्त्रियांचे बोलणे शुकाने ऐकले आणि शुकाच्या मनात विकल्प आला आणि त्याचा घात घडला.  
 
एक भले मोठे जलाशय होते. त्या जलाशयात काही अप्सरा जलक्रीडा करण्यास आल्या होत्या. स्वच्छंदपणे त्यांचा जलविहार चालला होता. शुकही त्याच जलाशयात स्नानास चालला होता. अप्सरांना शुकाची चाहूल लागली. शुक त्यांच्या जवळून जात असताना त्या अप्सरांना संकोच वाटला नव्हता. शुका मागून व्यासही त्याच जलाशयात स्नानास चालले होते. व्यासांची चाहूल लागताच मात्र अप्सरांना आपल्या अंगावर वस्त्रे नसल्याची लाज वाटली. अप्सरांचे वागणे व्यासांच्या लक्षात आले. त्यांना वाटले शुक तरूण आहे. अप्सरांच्या मनात त्याच्याबद्दल आसक्ती असेल म्हणून अप्सरांनी आपल्या देहाचे त्याच्यापुढे प्रदर्शन केले असेल. आपण त्यांच्या आजोबांच्या वयाचे आहोत, आपल्या मनात पाप नाही, तरी त्या आपल्याला का लाजल्या असतील? अप्सरांच्या मनातील भावना जाणून घेण्याची त्यांना तीव्र इच्छा झाली. 
 
आपल्या मनात आलेली शंका विचारण्यासाठी अप्सरांना त्यांच्या वर्तनाचा अर्थ विचारला. व्यासांना त्या अप्सरांनी उत्तर दिले ‘जसे ज्याचे अंतरमन तसे त्याचे बाह्य वर्तन. शुकाच्या मनात भेदाभेद नाही. कोणतेच द्वैत नाही. आमच्यात आणि त्याच्यात शुकाला भेदच दिसत नाही. ज्याच्या मनात स्त्री-पुरूष हा भेदच नाही, तिथे लाजायचे काय कारण? म्हणून तो इथून जात असताना आम्ही निसंकोच होतो. ऋषिवरा तुझ्या मनात भेदाभेद आहे. स्त्रीकडे तू स्त्री म्हणून पहातोस. म्हणून तुला पाहिल्यानंतर आम्हाला लाज वाटली.  
 
अप्सरांचे ते बोल शुकाच्या कानावर पडले आणि त्याच्या मनाला अभिमानाचा स्पर्श झाला होता. ‘मी ज्ञाता आहे, तर प्रत्यक्ष माझे वडील व्यास अज्ञानी आहेत. मी मुक्त आहे. ते नाहीत‘. हा ‘मीपणा‘ शुकाच्या मनात उपजला होता. जिथे द्वैत भाव निर्माण होतो तिथे अद्वैत संपते. तिथे ब्रह्मज्ञान नष्ट होते. मनात विकल्प आला की, माणसाचे होते. तो भ्रमिष्ट होतो. शुकाचे तसेच झाले. त्याला ‘मी‘ पणाची बाधा झाली. गुरूकृपेशिवाय असलेले ब्रह्मज्ञान मनात विकल्प येताच क्षीण होऊन जाते; मात्र गुरूकृपेने हेच ज्ञान पूर्णत्वाला पोचते. शुकावर गुरूकृपा झाली नव्हती. गुरूकृपेशिवाय शुकाला मिळालेले ज्ञान हे अक्षय नव्हते. शुकाच्या मनात कधीही विकल्प निर्माण होऊ शकतो आणि एकदा का विकल्प निर्माण झाला, की ते ब्रह्मज्ञान संपून जाते. तो साधा संसारी, जन्म मरणाच्या चक्रात अडकलेला सामान्य माणूस होतो.  
 
व्यासांना त्याची जाणीव झाली होती आणि शुकाच्या भल्यासाठी व्यासांनी  शुकाला सांगितले की, ‘तू सत्संग कर. गुरूकृपेशिवाय मिळालेले ज्ञान हे अक्षय नसते. तुला गुरूकृपेची गरज आहे. तू तुझ्या मनाने जनकाकडे जा. जनक पृथ्वीचे राज्य करीत आहे; पण तो विदेही आहे. म्हणजे त्याला देहाचे यत्किंचितही आकर्षण नाही. त्याला प्रपंचाचे आणि परमार्थाचे ज्ञान आहे. तो संशयरहीत आहे. तुझ्या मनात संशय निर्माण झाला आहे. तो संशय जनक नि:संशय दूर करेल‘.  
 
शुकाच्या मनात विकल्प आला होताच आपण सर्वश्रेष्ठ असल्याचा अहंकार निर्माण झाला होता.आपल्या वडिलांनी जनकाकडे जायला सांगावे, आणि आपण  जावे हे त्याला कमीपणाचे वाटले होते. वडिलांनी केलेला उपदेश मनावर घ्यावा असे शुकाला वाटले नव्हते, अहंपणाने तो मनात म्हणाला व्यासांची ज्ञानवृत्ती, पात्रता तर मला समजलेली आहे. आता जनकाची ज्ञानोक्ती काय आहे, त्याची पात्रता काय आहे ते पाहू. म्हणून तो जनकाकडे जाण्यास तयार झाला.  
 
दिगंबर अवस्थेत राहाणारा शुक त्याच्या मनात आले या अवस्थेत जर आपण जनकाच्या नगरीत गेलो, तर लोक आपला उपहास करतील. म्हणून लोकलज्जेस्तव तो लंगोटी नेसून शुक जनकाकडे निघाला. देवाच्या असो, की राजाच्या दर्शनाला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये अशी रीत आहे. जनकाकडे जाताना काय न्यावे असा शुकाला प्रश्न पडला होता. त्याने विचार केला जनक हा तर विदेही, वैरागी, निर्लोभी आहे. म्हणून जनकाला द्यायला त्याने चक्क राख घेतली. जी बैराग्याला लागते.  
 
शुक जनकाच्या प्रासादाच्या दारात येऊन उभा राहिला. द्वारपालाने शुकाकडे पाहिले, शुकाच्या गळ्यात जानवे नव्हते म्हणजे तो ब्राह्मण नव्हता, हातात दंड नव्हता म्हणजे तो संन्यासी नव्हता. अंगावर लंगोटी होती म्हणजे हा दिगंबरही नव्हता, हा कोण आहे हे द्वारपालाला समजले नाही, म्हणून त्याने शुकाला विचारले की, ‘जनकाला कोण आले आहे म्हणून सांगू‘? त्यावर शुकाने सांगितले ‘‘मी ‘शुक‘. भेटीला आलो आहे असे जनकाला सांग‘. मी ‘शुक‘ आलो आहे या शब्दातच शुकाचा द्वैत भाव जागा झाला होता. शुकाचा निरोप सांगण्यासाठी द्वारपाल राजमंदिरात गेला. आपला निरोप मिळताच जनक सामोरा येईल, सन्मानाने आत नेईल, असा भावही शुकाच्या मनात निर्माण झाला होता. हाही विकल्पच शुकाच्या मनात उद्भवला होता. जनकाने ते जाणले. त्याने विचार केला की, ‘मी स्वत:च भेटीला गेलो, तर शुकाच्या मनात अजून विकल्प निर्माण होतील आणि व्यासांनी ज्या उद्देशाने शुकाला आपल्याकडे पाठविले आहे, तो पूर्ण 
होणार नाही‘.  
 
द्वारपालाबरोबर जनकाने शुकाला निरोप पाठविला ‘संग त्यक्त्वा सुखी भव, सोबत जे असेल त्याचा त्याग कर आणि सुखी हो’. जनकाच्या म्हणण्याचा अर्थ शुक हे नाव आहे त्याचा संग नको. शुकाला तो अर्थ समजला नाही, शुकाला हा निरोप ऐकून राग आला. त्याला वाटले मी काय स्त्री संग केला आहे की राजविलास? माझ्याकडे कसला संग आहे. तरीही सोबत घेतलेल्या वस्तूंचा त्याग करावा म्हणून त्याने हातातील राख फेकून दिली. लंगोटीही काढून टाकली. शुक द्वारपालाला म्हणाला, ‘राजाला सांग आता नि:संग झालेला ‘शुक‘ आला आहे‘. शुकाने शुक या नावाचा त्याग केलेला नव्हता.  
 
जनकाने शुकाचा निरोप ऐकला आणि पुन्हा द्वारपालासोबत निरोप पाठविला ‘संगत्यागे सुखप्राप्ती‘ त्यावर राजा असे का म्हणत आहे, मी कोणता संग टाकलेला नाही? म्हणून शुक जनकाबद्दल आदराने विचार करू लागला. मी शुक आहे, तर तो परमात्मा कोण आहे? देहामुळे मला शुक हे नाव मिळाले आहे. हा देह पंचमहाभुतांपासून बनलेला आहे. त्यात मी कोण आहे? त्यातील मी कुणीच नाही. मी अहं सोहं भावाच्या पलिकडील आहे. स्वत:ला शुक म्हणणे म्हणजे हा संगच झाला. माझ्या देहाला शुक नाव आहे. देहातल्या आत्माचे ते नाव नाही आत्मब्रह्मैक्याची प्रचिती हाच ब्रह्मसाक्षात्कार‘. असा विचार करता करता शुकाची वृत्ती स्व स्वरूपात विसावली. त्याला आत्मज्ञान झाले अणि त्याला निर्विकल्प समाधी लागली.  जनकाने त्यानंतर शुकाला अंतरगृहात आणून ठेवले. शुकात ब्रह्मत्व बाणले आहे याची खात्री राण्यांकडून जनकाने करून घेतली. त्यानंतर जनक स्वत: शुकाला भेटला. आपल्याला भेटायला जनक आला आहे हे समजताच शुक आनंदून गेला. जनकाला मनोभावे 
शरण गेला. 
 
शुकाला आत्मज्ञान प्राप्त झाले. तो जनकाला म्हणाला, ‘विकल्पामुळे व्यास अज्ञानी आहेत असे मी समजलो. या माया, अविद्या, विकल्पाचा समूळ नायनाट तू द्वारपालातर्फे निरोप देऊन केलास’ आत्मज्ञान झालेला शुक जनकाला शरण गेला, जनकाने शुकाला ज्ञानोपदेश केला. शुक वैराग्यपूर्ण होताच तथापी गुरू उपदेशाने त्याचे वैराग्य परिपक्व झाले. गुरूमुळे शुक परमार्थ साधू शकला होता.  
 
(आधार संत एकनाथकृत भावार्थ रामायण बालकांड अध्याय १०)

Related Articles